ने.हि.विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा.
नागभीड : नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, नवेगाव पांडव येथे एनसीसी विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या उत्साह पुणॅ कार्यक्रमात देशभक्तीची भावना आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. नरेंद्र चुऱ्हे , ए.एन.ओ., 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नागपूर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे शिक्षक सर्वश्री. हेमके , श्री. फटाले आणि कु. कुळे यांची उपस्थिती लाभली.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धातील शौर्यगाथा, भारतीय सैन्याचे पराक्रम आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व प्रभावीपणे मांडत उपस्थितांची मने जिंकली.
अध्यक्षीय भाषणात श्री. नरेंद्र चुऱ्हे यांनी कारगिल युद्धाचा इतिहास, भारतीय जवानांचे अदम्य शौर्य, त्याग आणि देशभक्ती यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, शिस्त आणि देशप्रेमाची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. फटाले यांनी एनसीसीचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेसाठीची तयारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एनसीसीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. हेमके यांनी कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्यपूर्ण आणि प्रेरणादायी वीरगाथा विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितल्या.
कु. कुळे यांनी कारगिल विजय दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजली पाहिजे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व एनसीसी कॅडेट्सनी एकत्रितपणे एनसीसी गीत सादर करून राष्ट्रसेवेची शपथ दृढ केली आणि देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


